देशात उष्णतेचा कहर, अनेक शहरात पारा ४० शी पार; कोणत्या शहरात किती तापमान घ्या जाणून..

भारत

देशात सध्या वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. सध्या देशातील तापमानात (Temperature) कमालीची वाढ झाली आहे. देशातील बहुतांश शहारात तापमानाचा पारा हा ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे या उष्णतेचा नागरिकांना त्रास होत असून, दुपारच्या वेळी रस्ते रिकामे दिसत आहेत. दुपारच्या वेळी खूप नागरिक घरीच राहणे पसंद करत आहेत.

देशात कोणत्या राज्यात व शहरात किती तापमानाची नोंद झाली

उत्तर प्रदेशातील हमीरपूर आणि प्रयागराज या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सफदरजंग हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. जे सामान्य तापमानापेक्षा चार अंशांनी जास्त आहे. दिल्लीत सलग चौथ्या दिवशी कमाल तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. पुसा आणि पीतमपुरा भागात कमाल तापमान अनुक्रमे ४१.६ अंश ते ४१.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. अशा तापमान वाढीमुळे नागरिकांना उष्णतेचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

heat wave

पश्चिम बंगालमध्ये तापमानात वाढ

पश्चिम बंगालमध्ये बांकुरा येथे सर्वाधिक ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात कमाल ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली गेली आहे.

हरियाणा आणि पंजाबमध्ये देखील तापमानात वाढ

हरियाणा आणि पंजाबमध्ये उष्ण हवामानाची स्थिती कायम राहिली असून दोन्ही राज्यांच्या बहुतांश भागात काल कमाल तापमान ४० अंशांच्या वर पोहोचले आहे. हरियाणातील हवामान विभागाच्या अहवालानुसार, हिसारमध्ये तापमानाचा पारा ४१.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. हरियाणातील कर्नालमध्ये ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर अंबालामध्ये ३९.७ अंश सेल्सिअस, नारनौल येथे ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पंजाबमधील भटिंडा येथे काल ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर अमृतसरमध्ये ३६.६ अंश सेल्सिअस आणि पटियालामध्ये ४१.२ अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झाली. पंजाब हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राजस्थानच्या वाळवंटी भागात तापमानात वाढ

राजस्थानच्या वाळवंटी भागात तापमानात या वर्षी चांगलीच वाढ झाली आहे. चित्तोडगडमध्ये काल ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर कोटा (४२.८ अंश), बांसवाडा (४२.७ अंश), फलोदी (४२.२ अंश), ढोलपूर (४२अंश), अलवर आणि सवाई माधोपूर (प्रत्येकी ४१.७ अंश) आहे. ) टोंक (४१.६ अंश), चुरू आणि पिलानी (प्रत्येकी ४१.४ अंश), बारमेर (४१.२ अंश) आणि जयपूर (४० अंश सेल्सिअस) अशी तापमानात वाढ दिसून आली.

लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये देखील किंचित तापमानाची वाढ दिसून आली

हिमाचल प्रदेश मध्ये देखील तापमानात वाढ पाहायला मिळाली. शिमला २५.४ अंश, मनाली २१ अंश, धर्मशाला २८.२ अंश आणि नारकंडा १९.२ या लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये देखील अशी सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (APSDMA) मंगळवारी एका मंडलात तीव्र उष्णतेची लाट आणि राज्यभरातील आणखी ११७ ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातही तापमानात वाढ

महाराष्ट्रातही तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन दिवस विदर्भाच्या (Vidarbha) तापमानात अधिक वाढ होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. काल विदर्भात ४० अंशाच्या पुढे तापमानाची नोंद करण्यात आली.

देशात तापमानात वाढ झालेली असल्याने नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे किंवा सोबत पाण्याची बॉटल किंवा छत्रीचा वापर जरूर करावा त्यामुळे तुम्हाला उन्हाच्या तडाक्यापासून संरक्षण मिळेल. लिंबू रस, कलिंगड, काकडी अशा फळांचा आहारात समावेश करावा.

हे हि वाचा : उन्हाळ्यात खरबूज खाणे खूप फायद्याचे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, उच्च रक्तदाब होईल कमी!

Follow Us on Facebook